
आर.आर. पाटील यांचे मत, 'जागर जाणिवांचा तुमच्या आमच्या लेकींचा' पदयात्रेस प्रारंभ
शिरवळ (जि.सातारा) - 'प्रत्येकाला आई पाहिजे,पत्नी पाहिजे,बहीण पाहिजे, मात्र मुलगी नको ही मानसिकता समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल, अशी भीती व्यक्त करतानाच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लोकजागृती आणि लोकशिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज (गुरुवारी) येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्त्री-भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी "जागर जाणिवांचा, तुमच्या आमच्या लेकींचा ' पदयात्रेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांवात आज झाला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत आर.आर.पाटील बोलत होते. ते म्हणाले,"" आज जन्माला येण्याचा मुलींचा हक्कच नाकारला जात आहे. त्यामुळे स्त्री पुरुष यांचे प्रमाण ढासळले आहे. मुलगी नको ही मानसिकता भविष्यात समाजाचे स्वास्थ बिघडून टाकेल. त्यामुळे सामाजिक स्वास्थ टिकेल का नाही अशी आपणास भीती वाटते. सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान समाजाचा अधःपात करेल की काय ? अशी शंका येते. जे डॉक्टर तयार करण्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले, तेच डॉक्टर आज कसायाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे जाणीव जागृतीची समाजात गरज आहे. केवळ कायदा करून उपयोग होणार नाही. लोकजागृती व लोकशिक्षण हेच प्रभावी साधन ठरेल.''
सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आर.आर.पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून नायगाव ते पुणे या स्त्री-भ्रूणहत्याविरोधातील जागृती पदयात्रेला प्रारंभ झाला.